फक्त चार लोक चालवतात हा देश, लोकसभेत राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा


नवी दिल्ली – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हा देश फक्त चार लोक चालवत असल्याचे म्हटले आहे. बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केल्यानंतर राहुल गांधी आज लोकसभेत आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. राहुल गांधी यांनी बाजार समित्या बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. देशाचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भाजप खासदारांनी यावेळी सभागृहात मोठ्या प्रमाणात गदारोळ घातला.

‘हम दो हमारे दो’ घोषणा काही वर्षांपूर्वी देण्यात आला होती. ज्याप्रमाणे कोरोना दुसऱ्या रुपात आला आहे, त्याचप्रमाणे ही घोषणा आली आहे. चार लोक हा देश चालवतात हम दो और हमारे दो, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. नरेंद्र मोदी हेतूबद्दल बोलले होते, पण फक्त आपल्या मित्रांची मदत करणे त्यांचा हेतू असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या हे तीन पर्याय आपण दिले असल्याचे उत्तरही त्यांनी नरेंद्र मोदींना दिले.

देशातील शेतकरी, दुकानदार, छोटे व्यापारी यांचे व्यवसाय कायदे लागू झाल्यानंतर बंद होतील. फक्त दोन लोक देश चालवणार. भारतातील लोक अनेक वर्षांनी भूकबळीचे शिकार ठरतील. रोजगार मिळणार नाहीत. नोटबंदीपासून मोदींनी याची सुरुवात केली. गरीब, शेतकरी, मजुरांकडून पैसे घेऊन खिशात टाकण्याची योजना होती. नंतर जीएसटी…गब्बर सिंग टॅक्स आणला. नंतर पुन्हा तेच शेतकरी, व्यापारी, दुकानदारांवर आक्रमण केले. मजूर कोरोना संकटात बसचे तिकीट मागत होते, पण देण्यात आले नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.

आपला देश आज रोजगार निर्मिती करु शकत नाही. रोजगार उद्याही येणार नाहीत, कारण सरकारने छोटे उद्योग, व्यापारी, मजूर, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हे शेतकऱ्यांचे नाही तर देशाचे आंदोलन आहे. शेतकरी अंधारात बॅटरी दाखवत आहेत. देश हम दो हमारे दो विरोधात उठणार आहे, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

शेतकरी, मजूर आणि छोट्या दुकानदारांना त्यांच्या पैशांपासून दूर करु शकतील, असे तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला लिहून देऊ इच्छितो की शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही. शेतकरी, छोटे दुकानदार तुम्हाला हटवणार आहेत. तुम्हाला कायदे मागे घ्यावेच लागतील, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

फक्त शेतकरी आंदोलनावर मी बोलणार आहे. जे २०० शेतकरी शहीद झाले त्यांना यांनी श्रद्धांजली वाहिली नाही. माझ्या भाषणानंतर दोन मिनिटांचे मौन बाळगणार असल्याचे सांगत राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी शेतकऱ्यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली.

सभागृहात राहुल गांधींच्या भाषणावेळी मोठा गोंधळ झाला. काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी एकमेकांना नियम वाचून दाखवले. राहुल गांधी योग्य मुद्यावर बोलत असल्याचे काँग्रेसच्या अधीरंजन चौधरी यांनी नियम वाचून दाखवत सांगितले. शेती हा बजेटमधील विषय असल्याने या विषयावर राहुल बोलत असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे भाजपच्या खासदारांनी जर तुम्ही ४० टक्के माल हा अदानी, अंबानींच्या गोदामांमध्ये जातो असे सांगत आहात तर त्यासंदर्भातील पुरावा द्या, अशी मागणी केली. ही आकडेवारी येते कुठून याचा खुलासा करा अशी मागणीही भाजपच्या खासदारांनी केली.