विमान उड्डाण वादावर राज्यपालांची प्रतिक्रिया


मुंबई – आज अजून एका वादाची भर राज्यपाल आणि ठाकरे सरकारमधील वादात पडली आहे. देहरादूनला जाण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुंबई विमानतळावर पोहोचले असता त्यांना सरकारी विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे खासगी विमानाने देहरादूनला राज्यपाल पोहोचले. भाजपचे नेते राज्यपालांना विमान प्रवासाची परवानगी न दिल्याने आक्रमक झाले असून यावरुन ठाकरे सरकारवर ते निशाणा साधत आहेत. दरम्यान देहरादूनला पोहोचल्यानंतर राज्यपालांनी या संपूर्ण प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देहरादूनला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जाणार होते. राज्यपाल देहरादूनला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले असता उड्डाणाची परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आल्यामुळे राज्यपालांना पुन्हा परतावे लागले. राज्यपालांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ते विमान काही कारणाने मिळाले नाही म्हणून दुसऱ्या विमानाने प्रवास केला. एक विमान आवडले नाही म्हणून दुसऱ्या विमानाने प्रवास केला. त्यांनी यावेळी खासगी दौरा असल्यामुळे परवानगी दिली नाही का? अशी विचारणा करण्यात आली असता, आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा काय असू शकतो? अशी विचारणा त्यांनी केली.

मुख्यमंत्री सचिवालयाकडूनही या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. विमान उपलब्धतेची खातरजमा राज्यपाल सचिवालयाने करायला हवी होती, असे मुख्यमंत्री सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच विमान उड्डाणाला मान्यता नसल्याचा संदेश आदल्याच दिवशी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

सरकारी कामासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंडला जाणार होते. ते लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या १२२ व्या इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्रॅमच्या व्हॅलेडिक्टरी प्रोग्रॅमला हजेरी लावणार होते. ११ फेब्रुवारी रोजी राज्यपाल सकाळी १० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर पोहोचले होते. २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारला राज्यपाल सचिवालयाने पत्र लिहून विमान प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. मुख्यमंत्री कार्यालयालाही याबाबत कळवण्यात आले होते. राज्यपाल गुरुवारी ठरलेल्या वेळेनुसार विमानतळावर पोहोचले आणि विमानात बसले देखील. पण, राज्यपालांना तेव्हा सरकारी विमानातून प्रवासासाठी परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार देहराडूनला जाण्यासाठी खासगी विमानाची तिकीटाचे बुकिंग करण्यात आले आणि ते १२. १५ च्या विमानानं देहराडूनसाठी रवाना झाले.