फडणवीसांचा ‘एकला चलो रे’ चा नारा, पण चंद्रकांत दादा म्हणतात मनसेसोबत युती शक्य


पुणे : भाजप-मनसे युतीचे वारे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत होते. पण माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यावर गुरुवारी ( दि. ११ ) आले असताना पुणे महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. स्वबळाची घोषणा करून काही तास उलटत नाही तोच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र मनसेने भूमिका बदलली तर युती शक्य असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. पण भाजपमधील दोन दिग्गज नेत्यांनी घेतलेल्या या वेगवेगळ्या भूमिकांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजप मनसे युतीची चर्चा पुणे महापालिका निवडणुकीसाठी सुरु असताना महापालिका निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांनी स्वबळाचा नारा दिला आहे. कोणाची आम्हाला गरज नाही, आमच्याच ताकदीवर आम्ही निवडणुक लढवू अन् जिंकू शकतो असे फडणवीस यांनी आत्मविश्वास दाखविला होता. आज पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस हे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

विशेष म्हणजे या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित नव्हते. पण यावेळी वेगळी भूमिका भाजपने घेतली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेससोबत आगामी निवडणुकांत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. राहिला प्रश्न मनसेचा. त्यांनी त्यांची भूमिका बदलावी हे आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यांनी जर भूमिका बदलली तर त्यांना सोबत घेऊ, अन्यथा आम्ही एकटेच लढू असे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजप सत्तेत येऊ नये यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. हे पक्ष अधिकृतरित्या सोबत येणार नाहीत. पण सामंजस्याने एकत्रित निवडणुक लढवतील, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले यांच्या मराठा आरक्षणाबाबत आपण भूमिकेशी सहमत असल्याचे म्हणाले आहे. अशोक चव्हाण यांनी हे बोलतानाच त्यांनी तरी मराठा आरक्षणाचा सत्तावीसशे पानी अहवाल पूर्ण वाचला आहे का, असा प्रश्न विचारला आहे.