मागील चार वर्षात एवढ्या लोकांनी सोडले भारतीय नागरिकत्व


नवी दिल्ली: नुकतेच देशातील नागरिकांविषयी अत्यंत महत्वाची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 2015 पासून ते 2019 पर्यंत जवळपास 6.76 लाख नागरिकांनी आपल्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्याचे सरकारने म्हटले आहे. आता इतर देशात स्थलांतर केलेले नागरिक कायमचे स्थलांतरित झाले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली. सन 2015 आणि 2016 साली 1.45 लाख नागरिक, सन 2017 साली 1.28 लाख नागरिक, सन 2018 साली 1.25 लाख नागरिक तर सन 2019 साली 1.36 लाख भारतीय नागरिकांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की एक कोटी 24 लाख 99 हजार 395 भारतीय नागरिक सध्या जगभरात वास्तव्यास असून त्यांच्यापैकी 37 लाख नागरिक हे OCI कार्डधारक आहेत.

आपले भारतीय नागरिकत्व या नागरिकांनी नेमक्या कोणत्या कारणांमुळे सोडले हे स्पष्ट करण्यात आले नाही. तरीही या लोकांनी रोजगारानिमित्त इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. लोकसभेत माहिती देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की भारतातील 93,032 श्रीलंकन नागरिक तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांत शरणार्थी म्हणून राहत आहेत. त्यामधील 58,843 श्रीलंकन नागरिक हे तामिळनाडूमधील विविध शिबिरात राहत आहेत, तर 34,135 नागरिक हे विविध भागात राहत आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या लोकांनी आपल्या नावाची नोंद केल्याचेही गृह राज्यमंत्री म्हणाले.