गुलाम नबी आझादांचे कौतुक करताना भावूक झाले नरेंद्र मोदी


नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. जम्मू काश्मिरचे हे चारही सदस्य प्रतिनिधित्व करतात. सभागृहात या सदस्यांना निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक करताना भावूक झाले. दहशतवादी हल्ल्यानंतरची आझाद यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना मोदींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलताना म्हणाले, जम्मू काश्मीर आणि देशाच्या उपयोगी गुलाम नबी आझाद यांची क्षमता पडेल. जम्मू काश्मीरमध्ये मी अनेक वर्ष काम केले. स्कूटरवर फिरण्याची संधी त्यावेळी मिळाली होती. गुलाम नबी आझाद यांच्यानंतर जे कुणी हे पद सांभाळेल त्यांना गुलाम नबी यांच्यासारखे राहताना अडचण येईल. कारण पक्षाबरोबरच देशाची आणि संसदेचीही गुलाम नबी आझाद हे काळजी करायचे. देशाला त्यांनी प्राधान्य दिले. शरद पवार यांनाही मी याच श्रेणीत बघतो. मी एक बैठक घेत होतो. त्यावेळी त्यांनी फोन करून सांगितले की, सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घ्या. ती बैठक मी घेतली. २८ वर्षांचा कार्यकाळ हा खूप मोठा असतो, असे मोदी म्हणाले.

तेव्हा मी संसदेत नव्हतो. मी आणि गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा करत होतो. पत्रकारांनी त्यावेळी विचारले, तेव्हा गुलाम नबी म्हणाले होते, आम्हाला नेहमी वादविवाद करताना बघता पण, आम्ही कुटुंबासारखे आहोत. गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरची आठवण यावी असे गार्डन तयार केले असल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

गुजरातमधील यात्रेकरूंवर जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मला गुलाम नबी यांचा त्यावेळी सर्वात आधी फोन आला होता. तो फोन त्यावेळी फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. मी त्यानंतर तत्कालिन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांना फोन केला. मृतदेह आणण्यासाठी त्यांच्याकडे विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनी व्यवस्था करतो, असे सांगितले. त्यानंतर रात्रीही ते विमानतळावर होते.

विमानतळावरून गुलाम नबी यांनी पुन्हा कॉल केला. एखादा माणूस जसा कुटुंबातील व्यक्तीची चिंता करतो, तशीच चिंता ते त्यावेळी करत होते. पद, सत्ता जीवनात येत-जात राहते. ती सांभाळता आली पाहिजे. माझ्यासाठी तो फार भावूक क्षण होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन केला आणि विचारले सगळे लोक पोहोचलेत ना? त्यामुळे मी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर असल्याचे सांगत असताना पंतप्रधान मोदींचे डोळे भरून आले.