पेट्रोल दरवाढीवरून अमिताभ, अक्षय कुमारवर काँग्रेसने साधला निशाणा


मुंबई – सध्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले असून पेट्रोलचे दर अनेक शहरांमध्ये नव्वदीपार गेले आहेत. त्याचबरोबर डिझेलही प्रचंड महागले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचे जुने ट्विट दाखवत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात वाढल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खेर यांनी ट्विट करून टीका केली होती. अमिताभ यांनी युपीए सरकारच्या काळात केलेली काही ट्विट, त्याचबरोबर अक्षय कुमार व अनुपम खेर यांनी केलेल्या ट्विटवरून भाई जगताप यांनी सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे.


भाई जगताप यांनी या अभिनेत्यांच्या ट्विटचा फोटो पोस्ट करत ‘हे देशभक्त आता ईलेक्ट्रीकल्स कार चालवतात का?’, असा प्रश्न विचारला आहे. भाई जगताप यांनी अमिताभ बच्चन यांनी केलेले तीन ट्विट पोस्ट केले आहेत. यात ‘रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, गाडी खरीदो गे cash से और petrol loan से आएगा।, अशा स्वरूपाचे ट्विट आहेत. त्याचबरोबर अक्षय कुमारनेही सायकल वापरण्यास सुरूवात करावी लागेल, असे म्हटलेले ट्विट जगताप यांनी पोस्ट केले आहे.

पेट्रोलचे दर देशभरात प्रचंड वाढले असून, मुंबईत सोमवारी (८ फेब्रुवारी) पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९३.४९ रुपये एवढे आहेत. तर इतर शहरातही अशीच परिस्थिती आहे. नागपूरमध्ये प्रतिलिटर ८४.५४ रुपये, ८२.०४ रुपये, नाशिक ८३.२४ रूपये लिटर पेट्रोलचे दर आहेत.