आज संसदेत गाजणार अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण


नवी दिल्ली – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सोमवारचा दिवस हा गाजण्याची शक्यता दिसत आहे. या विषयासंदर्भात संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी करणारा प्रस्ताव शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सोमवारी सकाळी संसदेमध्ये सादर केल्याचे वृत्त टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिले आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे अर्णब यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट असल्याचा दावा चतुर्वेदी यांनी केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार लीक झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या मुद्द्यावरुन हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून यावरुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी करत सस्पेन्शन ऑफ बिझनेस नोटीस देण्याची मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. हे चॅट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे उल्लंघन असल्याचेही प्रियंका यांनी म्हटले आहे.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोशल मीडियावर रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. अनेक शंका या संवादावरून उपस्थित करण्यात आल्या. मंत्र्याबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य दोघांमधील संवादामध्ये करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर बालाकोट एअर स्ट्राईकबद्दलही संवाद झालेल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीाडियावर व्हायरल झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे. याशिवाय दहशतवाद्यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे घडविलेल्या आत्मघातकी हल्ल्याबाबत अर्णब यांचे आक्षेपार्ह वक्तव्य आढळते. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. या व्हॉट्सअ‍ॅप संवादात पुलवामा हल्ल्याबाबत अर्णब यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार नागरिकांनी ट्विटरसह अन्य सोशल मीडियावरून घेतला. शुक्रवारी याच संवादांबाबत सोशल मीडियावर चर्चा होती. मीम्स आणि टीकेचा भडीमार होताना दिसला.

भारतीय जनता पक्षाने आणि मोदी सरकारने हे चॅट समोर आल्यानंतर तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला असून त्यामध्ये रिपब्लिक चॅनलची चौकशी चालू आहे. त्याचबरोबर बार्क चे पूर्व प्रमुख पार्थो दास गुप्ता यांना अटकही करण्यात आलेली आहे. मोदी सरकारकडून सदर टीआरपी घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला असून त्या करता उत्तरप्रदेशमध्ये वेगळी केस नोंदवण्याचा प्रकार देखील घडला. आपले कारस्थान उघड पडेल या हेतून हा सगळा आटापिटा होता, हे व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून दिसून येत आहे.

सदर चॅट्समधून रिपब्लिक चॅनेलचे प्रमुख आपली पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय आणि एएस नावाच्या व्यक्तीशी जवळीक असल्याचे सांगत असल्याचे दिसून येते असल्याचे सांगत आहे, सावंत यांनी याकडे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर केंद्र सरकारशी संबंध असल्याने हे दोन्ही व्यक्ती रिपब्लिक चॅनलच्या टीआरपीमध्ये वाढ होण्याची व्यूव्हरचना तयार करत होते, हे ही दिसून येते. एएस नावाची यामध्ये व्यक्ती कोण आहे, हे भाजपने स्पष्ट करण्याची गरज आहे. तसेच रिपब्लिक चॅनलबद्दल माहिती जनसंपर्क मंत्रालयाला मिळालेली तक्रार बाजूला ठेवण्यात आली आहे, असे मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी सांगितले, असे यात नमूद करण्यात आलेले आहे याचाच अर्थ रिपब्लिक चॅनलला वाचविण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत होते हे स्पष्ट होत असल्याचा आरोप सावंत यांनी केला होता.