शरजीलला पळून जाण्यात ठाकरे सरकारने मदत केली; आशिष शेलारांचा आरोप


मुंबई – भाजप शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन आक्रमक झाली असून शिवसेनेचे डोके ठिकाणावर आहे का? अशी विचारणा भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. शरजीलला पळून जाण्यात ठाकरे सरकारने मदत केल्याचा गंभीर आरोपही मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी केला आहे.

हिंदू समाजाविरोधात शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणे याचा अर्थ यांचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. अटक केली जाईल म्हणजे कधी आम्ही मागणी केल्यावर परिषदेला परवानगीच का दिली? असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे. शरजील इस्मानीने परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर का जाऊ दिले? त्याला पळून जाण्यासाठी मदत करण्याचे काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केले आहे. हे त्यांचे पाप असल्याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

महाविकास आघाडीने शरजीलला पळून जाण्यात मदत केल्यानंतर, दोन दिवस भाजपने आंदोलन केल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करु, हे म्हणणे म्हणजे पश्चातबुद्धी आहे. हिंदूंना सडलेला म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचे काम शिवसेनेने का केले हे स्पष्ट करावे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. शिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा. नागपूरच्या कार्यालयात आपण वारंवार भेटला आहात, आताही जावे, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला.

काल एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व भाजपची मक्तेदारी नसल्याचे म्हटले होते. ते यावर बोलताना म्हणाले की, भाजपला बाजूला ठेवण्याच्या हेतूने जे स्वत:च पर्याय म्हणून दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन, आपल्या विचारधारेला तिलांजली देऊन आले आहेत. त्यांनी देशातील जनतेच्या मानसिकतेच्या मतांवर भाष्य करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे असून सुर्यावर थुंकण्याचे प्रयोग मुख्यमंत्री महोदयांनी करु नयेत. खाली डोके आणि वर पाय अशी शिवसेनेची अवस्था झाली असून परराज्यातून महाराष्ट्रावर कोणी टीका केली तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण परदेशातून कोणी आपल्या देशाच्या विषयावर टिप्पणी, बदनामी केली तर यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे संजय राऊत यांनी जनतेसमोर मांडावे. आंदोलन कोणी आणि कसे केले जावे याचे काही नियम असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले.

देशहिताची, देशरक्षणाची जो कोणी भूमिका घेईल त्या व्यक्ती आणि विचाराच्या विरोधात ही काही मंडळी सातत्याने परकीय शक्तींच्या मदतीने उभे राहून आंदोलन करतात. त्यात आता शिवसेनादेखील सामील झाली असून हे दुर्दैव असल्याचा गंभीर आरोप आणि टीका आशिष शेलार यांनी केली.

आशिष शेलार संजय राऊत यांनी गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेण्याबद्दल बोलताना म्हणाले की, कोणाला कधी आणि कसे कोणी भेटावे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण शेतकरी आंदोलकांना भेटायला शिवसेना गेली असेल तर लोकसभेत, राज्यसभेत, महाविकास आघाडीच्या बैठकीत काय भूमिका होती आणि आझाद मैदानावरील शेतकरी आंदोलनावेळी काय भूमिका होती हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. अमिबाला सुद्ध लाज वाटावी अशाप्रकारे एकाच वेळी चार पद्धतीने चालणारा शिवसेना हा पक्ष आहे.