केंद्र सरकारचे धोरण झिंगलेल्या दारुड्या सारखे ; प्रकाश आंबेडकर


मुंबई: सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केंद्र सरकार करणार असल्याचे कंपन्यांना वाटत असल्यामुळेच शेअर मार्केट अप झाले आहे. पण, कितीही प्रयत्न केंद्राने केला तरी आम्ही सरकारला सार्वजनिक कंपन्या विकू देणार नाही, त्यासाठी उग्र आंदोलन छेडू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

आज पत्रकार परिषद घेऊन ही आक्रमक भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली. शेअर मार्केट कोरोना काळात खेळण्यासारखे झाले होते. आता शेअर मार्केट सावरले आहे. सेन्सेक्स वाढला आहे. कारण सरकारी कंपन्यांचे केंद्राकडून खासगीकरण केले जाईल, असे कंपन्यांना वाटत असल्यामुळे शेअर मार्केटमधील गुंतवणूक वाढली आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही सरकारला पब्लिक सेक्टर विकू देणार नसल्याचे आंबेडकरांनी सांगितले.

कोरोनानंतर केंद्र सरकारने आपले पहिले बजेट सादर केले आहे. सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील आकडेवारी पाहिली तर केंद्राच्या तिजोरीत 19,76,424 लाख कोटी रुपये आहेत. सेन्सेक्स वाढल्याने अनेकांना सरकारने चांगले बजेट मांडल्याचे वाटत आहे. पण वस्तुस्थिती वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळात कामगार किंवा आयटी सेक्टरमधील कामगार हे व्हर्च्युअली काम करत होते. त्यांची परिस्थीत आज वाईट आहे. आयटी सेक्टरमधील कामगारांचे पगार कोरोना काळात कापले गेल्यामुळे या लोकांनाच आत्मविश्वास वाढवला जाईल, अशी अपेक्षा होती. पण बजेटमध्ये तसे काहीच दिसून आले नाही. ज्यांचे लॉकडाऊनमुळे पुनर्वसन झाले त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यांना नातेवाईकांच्या रेशनकार्डवर धान्य घ्यावे लागत आहे. या बजेटमध्ये त्यांच्यासाठी काहीच नसल्याची टीकाही त्यांनी केली.

आमचा चायनीज अॅप बंद करण्यास पाठिंबा आहे. चायनीस वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. या वस्तूंवर बंदी घातली तर चीनची गुंतवणूक भारतात कशी येईल? असा सवालही त्यांनी केला. एअर इंडिया केंद्र सरकारने विकल्यास 5,23,228 कोटी तर ओएनसीजी विकल्यास 1 ते 2 लाख कोटी रुपये मिळतील. इंग्लंडमध्येही कंपन्या विकण्याचा प्रयोग करण्यात आला. पण त्यांनी सरकारी कंपन्या विकल्या नाहीत, आपल्याकडे मात्र सरकारी कंपन्या विकण्यावरच भर दिला जात असल्याचे सांगतानाच केंद्र सरकारचे धोरण झिंगलेल्या दारुड्या सारखे असल्याची टीकाही त्यांनी केली.