शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देणाऱ्या सेलिब्रेटिंना संजय राऊतांचा सल्ला


मुंबई – परदेशातील सेलिब्रेटिंनी आपल्या देशातील शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देत पाठिंबा दर्शवल्यानंतर त्याविरोधात भारतातील सेलिब्रेटिंनी भारत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना भारतातील सेलिब्रेटिंना आधी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि त्यानंतर आपल्या भूमिका मांडा, असा सल्ला दिला आहे.

या मुद्यावर राऊत म्हणाले, देशाचे आंदोलन सेलिब्रेटींवर चालत नाही. शेतकरी आंदोलनासाठी थंडी, पावसासारख्या परिस्थितीत गाझीपूर सीमेवर बसले आहेत. या सेलिब्रेटिंनी त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केली आहे का? देशातीाल जे सेलिब्रेटी ट्विटरवरुन आज बोलत आहेत, त्यांना भाजपाने एका लक्झरी बसमध्ये बसवून गाझीपूर, सिंघू बॉर्डरवर नेले पाहिजे आणि हजारो शेतकरी कोणत्या परिस्थितीत तीन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, आणि कसे राहत आहेत, हे दाखवायला पाहिजे.

शेतकऱ्याच्या बाजूने काही मोजके सेलिब्रेटी सोडले तर यातील एका तरी सेलिब्रेटी उभा राहिला आहे का? सर्वात आधी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि मग आपल्या काय भूमिका मांडायच्या आहेत त्या मांडा. या आंदोलनाला जगभरातील लोकांचाही पाठिंबा मिळत आहे. पण देशातील काही प्रमुख लोक त्यांना पाठिंबा द्यायला तयार नाहीत, कारण ते भीती आणि दहशतीखाली असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी काल मी चर्चा केली, आता हे आंदोलन पसरत चालले आहे. स्वतःला सेलिब्रेटी समजणाऱ्यांना सेलिब्रेटी कुणी केले? राज्यकर्त्यांनी किंवा राजकारण्यांनी त्यांना सेलिब्रेटी केलेले नाही, तर सामान्य, मध्यमवर्गीय व्यक्तींनी, कष्टकऱ्यानी, शेतकऱ्यांनी त्यांना डोक्यावर घेतले आणि सेलिब्रेटी केल्यामुळे तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.