व्यंकय्या नायडूंनी एक दिवसासाठी केले ‘आप’च्या तीन खासदारांचे निलंबन


नवी दिल्ली – कृषी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. त्यातच याचे तीव्र पडसाद राज्यसभेतही उमटले. विरोधकाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ राखून ठेवण्यावर एकमताने संमती झाली. पण, त्यापूर्वी राज्यसभेत घोषणा देत ‘आप’च्या खासदारांनी गोंधळ घातला. त्यांच्यावर सभापतींनी कारवाई करत त्यांना निलंबित केले.

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून, शेतकरी आंदोलनाची धग आणखी वाढली आहे. राज्यसभेत आज सकाळी कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यावरून सभागृहात बराच गदारोळ झाला. अखेर सभापतींनी विरोधकांच्या मागणीची दखल घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १५ तासांचा वेळ राखून ठेवला. पण, ही चर्चा सुरू होण्यापूर्वी आपच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी करत गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. आप खासदारांचा गोंधळ सुरू राहिल्यामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी तीन खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केले. सभापतींनी आपच्या तीन खासदारांवर २५५ नियमानुसार कारवाई केली.

तर सभागृहाचे काही सदस्य मोबाईलद्वारे सभागृहाच्या कामकाजाची शुटिंग करत असल्याचे निदर्शनास दिसून आले. हे वर्तन संसदीय शिष्टाचाराच्या विरोधात असल्याचे म्हणत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संताप व्यक्त केला. कामकाज तहकूब केल्यानंतर पुन्हा सुरू झाल्यानंतर सभापतींनी सदस्यांची कानउघाडणी केली.