राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा; आमच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही मोठी ट्रॅक्टर रॅली काढू


नवी दिल्ली – ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिली आहे. राज्यांमधील तसेच राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांकडून तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. यादरम्यान केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंतचा वेळ भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला असून त्याचबरोबर भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशारा दिला आहे. जर आमच्या प्रमुख मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या नाही तर आम्ही मोठी ट्रॅक्टर रॅली काढू, असे त्यांनी म्हटले आहे.

ऑक्टोबरपर्यंतची वेळ आम्ही सरकारला दिली आहे. त्यांनी जर आमचे ऐकले नाही तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात रॅली काढू. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आम्ही प्रवास करु. त्याचबरोबर येथील आंदोलनदेखील सुरु राहिल. कायदे जोपर्यंत मागे घेतले जात नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असे एएनआयशी बोलताना राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. गाझीपूर सीमेवर झारखंडचे कृषीमंत्री बादल पारेख यांनी भेट घेतल्यानंतर राकेश टिकैत यांनी हे वक्तव्य केले आहे.

नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार भारतीय किसान युनिअनने व्यक्त केला आहे. देशातील वेगवेगळ्या भागात आपण जाऊन मोहीम राबवणार असल्याचे राकेश टिकैत यांनी जाहीर केलेले आहे. कायदा जोपर्यंत मागे घेत नाही, तोपर्यंत घऱवापसी नसल्याचा नारा राकेश टिकैत यांनी दिलेला आहे.