मुंबई पोलिसांकडून अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात बदनामीचा दावा दाखल


मुंबई: अखेर मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. हा खटला मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला असून मुंबई पोलिसांची यामध्ये नाहक बदनामी केल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ही तक्रार मुंबई पोलिसांच्या वतीने पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दाखल केली आहे. मुंबई पोलिसांची अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने नाहक बदनामी केल्याचे या याचिकेत म्हटले आहे. तसेच अर्णब गोस्वामी आणि कुटुंबियांविरोधात अब्रुनुकसानीचा वैयक्तिक दावा मुंबई पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दाखल केला आहे. अभिषेक त्रिमुखे यांनी मुंबई सत्र न्यायालयात हा दावा भारतीय दंड संहितेच्या कलम 499, कलम 500 आणि कलम 501 अंतर्गत दाखल केला आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी या आधीच अर्णब गोस्वामी यांना अलिबागमधील वास्तूरचनाकार अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी अर्णब गोस्वामी यांना दिलासा दिला होता. नंतरच्या काळात मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याशी संबंधित ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांना आणि इतर काही लोकांना अटक केली आहे.

रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट काही दिवसापूर्वीच समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. पार्थ दासगुप्ता हे टीआरपी घोटाळ्यातील आरोपी असून मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या या नव्या याचिकेमुळे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.