उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार संजय राऊत


मुंबई – मंगळवारी, दुपारी एक वाजता गाझीपूरमधील आंदोलक शेतकऱ्यांची शिवसेना खासदार संजय राऊत भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर भेट घेण्यास जाणार असल्याचेही राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राजधानीतील शेतकरी आंदोलन प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर निर्णायक टप्प्यावर आले आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता शेतकऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय राऊतांनी घेतला.

शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय महाविकास आघाडीने घेतले. शेतकऱ्यांच्या संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत असल्याचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. अन्य एका ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले की, किसान आंदोलन झिंदाबाद! will visit protesting farmers at Gazipur today at 1 pm..जय जवान, जय किसान!

मागील जवळपास दोन महिन्यांपासून केंद्र सरकाच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱी संघटनांकडून आज एक आणखी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी संघटनांकडून ६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी याची घोषणा केली आहे. याच दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत सर्व रस्ते देखील अडवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच, दिल्ली व आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याबद्दल तसेच, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत विशेष घोषणा न करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, या घोषणेनंतर आता गाझीपुर बॉर्डरवरील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आलेली आहे.