मुंबई – राज्य सरकारने कोरोना लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर आता भरती प्रकियेला गती देण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागातील भरतीची गुडन्यूज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्यानंतर, आता पोलीस दलातही मोठी भरती लवकरच सुरु होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर, आता शिक्षण विभागातील भरतीसंदर्भात माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही ट्विटरवरुन दिली आहे.
शिक्षण विभागातील नोकर भरतीला ठाकरे सरकारची मान्यता
भरती प्रकियेची जाहिरात आरोग्य विभागाकडून निघाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात होईल, असे अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, 2538 जागांची भरती गेल्या काही दिवसांपूर्वी झाल्यानंतर पुन्हा गरज पडल्यास आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले होते. आता, शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीसंदर्भातील माहिती वर्षा गायकवाड यांनीही ट्विटरवरुन दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचानिर्णय घेण्यात आला आहे. pic.twitter.com/LgeoIbO7k4
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 29, 2021
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण २६६ पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे. त्याचबरोबर शासनाचे पत्रही जोडण्यात आल्यामुळे आता लिपिक पदासाठी लवकरच जाहिरात निघणार असून उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.