प्रकाश आंबेडकारांचा राष्ट्रपतींना सवाल; मग संघाने १५ ऑोगस्ट १९४७ ला काळा दिवस का साजरा केला होता?


नवी दिल्ली – शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचाराचे गालबोट लागले होते. लाल किल्ल्यावर काही आंदोलकांनी धार्मिक ध्वज फडकावला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेवरून आपल्या अभिभाषणातून नाराजी व्यक्त केली. राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिन आणि तिरंग्याच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. त्यावरून आता राष्ट्रपतींना महाराष्ट्रातील नेत्याने सवाल केला आहे. आपल्याला ज्या संघाने राष्ट्रपती बनवले आहे, त्यांना १९४९ मध्ये सरदार पटेल यांना लिहून द्यावे लागले असल्याचे म्हणत राष्ट्रपतींना प्रश्न विचारला आहे.

ट्विट करून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपतींना इतिहासाचा दाखल देत संघाने सरदार वल्लभभाई पटेल यांना दिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. आदरणीय राष्ट्रपती महोदय, प्रचंड दुःख आणि खेदाने आपल्याला याची आठवण करून देणे आवश्यक आहे की, आपल्याला ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रपती बनवले आहे, त्यांना १९४९ मध्ये सरदार पटेल यांना लिहून द्यावे लागले होते की, ते तिरंग्याचा अपमान करणार नाही आणि २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला कार्यालयात तिरंगा ध्वज फडकवू.


संघाने जर तिरंगा ध्वज तर फडकावला, पण स्वतःचा ध्वजही समान उंचीवर फडकावून आपली नियत दाखवून दिली होती. ही गोष्ट आपण विसरून गेला आहात का? तिरंगा आंदोलक शेतकऱ्यांनी खाली उतरवला नाही. तर शीख धर्माचा आणि शेतकऱ्यांचा झेंडा तिरंग्याच्या उंचीपासून १५ फूट खाली लावला, यात अपमान कुठे झाला? तुम्हाला जर हा अपमान वाटतो आहे, तर संघाने १५ ऑगस्ट १९४७ साली काळा दिवस साजरा केला होता. त्यांची निंदा, निषेध का करत नाही करत?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.


संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या भाषणात नव्या कृषी कायद्यांचे समर्थन करताना, या कायद्यांमुळे लहान शेतकऱ्यांना लाभ मिळू लागल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर प्रजासत्ताकदिनी शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराचा आणि राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा ‘अतिशय दुर्देवी’ अशा शब्दांत त्यांनी निषेध केला होता. जर संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असेल तर त्याचा वापर कायदा आणि नियम पाळून गांभीर्याने करणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले होते.