भाजपचे अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत – शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा दावा


नवी दिल्ली – सुमारे दोनशे जणांच्या जमावाने सिंघू सीमेवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या मोठय़ा फौजफाटय़ातही शेतकऱ्यांवर दगडफेक आणि मारहाण केली. त्यांच्या तंबूंची मोडतोड केल्यामुळे शुक्रवारी आंदोलनस्थळी दिवसभर तणाव निर्माण झाला होता. काही शेतकरी या घटनेत जखमी झाले. २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसेनंतर शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर शेतकरी आंदोलनातील दोन प्रमुख संघटनांनी माघात घेत आंदोलनातून बाजूला होत असल्याचे जाहीर केले. तसेच दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलकांना हटवण्यास उत्तर प्रदेश सरकारने सुरुवात केली. दुसरीकडे पोलिसांनी सिंघू सीमेवरही कारवाई केल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान याच गोंधळादरम्यान शुक्रवारी रात्री एक खळबळजनक दावा भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केला आहे. टिकैत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

शुक्रवारी रात्री ट्विटरवरुन टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेक भाजप नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे. अनेक भाजप नेत्यांचे मला आज फोन आले. आम्ही सुद्धा राजीनामा देत असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. पक्षात राहून अशाप्रकारे आम्ही शेतकऱ्यांचा अपमान पाहू शकत नाही. आम्ही अजूनही गप्प राहिलो तर येणारी पिढी आम्हाला कधीच माफ करणार नसल्याचे हे नेते म्हणाल्याचे ट्विट टिकैत यांनी केले आहे.

शनिवारी सकाळीही टिकैत यांनी एक ट्विट केले असून दिल्लीच्या सीमांवर पुन्हा जमा होण्यासाठी मोठ्याप्रमाणात शेतकरी निघाले असल्याचे म्हटले आहे. गावांमधून आज सकाळपासूनच ट्रॅक्टर निघण्यास सुरुवात झाली आहे. गाझीपूर सीमेवर आज कालपेक्षा अधिक शेतकरी पोहचणार असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे.

आंदोलन गुंडाळून मी निघून जाऊ शकलो असतो किंवा स्वत:ला अटकही करून घेतली असती पण, तसे केले असते तर, शेतकऱ्यांवर देशद्रोहाचा डाग लागला असता, तो कधीही पुसला गेला नसता आणि हेच मला मान्य नाही. आंदोलनाविरोधात षडयंत्र रचले असून आता मी जीव गेला तरी हटणार नसल्याचे टिकैत यांनी शुक्रवारी दिलेल्या भाषणात म्हटले आहे.

आंदोलनस्थळावरील वीज व पाण्याचा पुरवठा गाझीपूर प्रशासनाने तोडला असला तरी दिल्लीतील सत्ताधारी ‘आप’ सरकारने दोन्ही पुरवण्याची तयारी दाखवली. गावाकडून पाणी आल्याशिवाय पाणी घेणार नसल्याचे टिकैत म्हणाले होते. त्यांच्यासाठी पाणी आणले गेले व लहान मुलाच्या हस्ते टिकैत यांना दिले गेले. मुझफ्फरनगर येथे ‘महापंचायत’ घेऊन आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी घेतला. छोटय़ा-छोटय़ा गटांमध्ये शेतकऱ्यांनी दिल्लीकडे रवाना होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.