राष्ट्रपतींनी दिल्लीतील हिंसाचारावर व्यक्त केली नाराजी


नवी दिल्ली – राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. दिल्लीत नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उल्लेख केला. राष्ट्रपतींनी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे कौतूक करतानाच कृषी कायदे फायद्याचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. अधिवेशन राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू झाले. राष्ट्रपतींनी अभिभाषणात कोरोना आणि इतर संकटांचा उहापोह करताना केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतूक केले. योग्यवेळी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचल्याचे सांगत राष्ट्रपतींनी सरकारला शाबासकी दिली.

राष्ट्रपतींनी तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही भाष्य केले. तीन कृषी कायदे सखोल चर्चेनंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी करण्यात आले. १० कोटी पेक्षा जास्त छोट्या शेतकऱ्यांना या कृषी सुधारणांचा फायदा तात्काळ मिळणे सुरू झाले आहे. छोट्या शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने सध्या या कायद्यांना स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करून सरकार त्याचे पालन करेल. सरकार कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक आंदोलनाचे सरकार आदर करते. पण प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना दुर्दैवी आहे. जे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. तेच संविधान आपल्याला कायदा आणि नियमांचं गंभीरपणे पालन केले पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाले.