सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा; एक फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल


मुंबई – लोकल सेवेअभावी अनेक महिन्यांपासून हेळसांड होत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा कोरोनामुळे परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. पण १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतील लोकल रेल्वे सेवा विशिष्ट वेळांच्या निर्धारित करून सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.

मुंबईतील लोकल सेवा कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली होती. हळूहळू लोकल सेवा सुरू करण्यात आली. पण सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मूभा देण्यात न आल्यामुळे सामान्य नागरिकांची हेळसांड होत होती. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेळेच्या काही नियमांसह सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील, याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्याप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसाठी आता खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे.

सकाळच्या पहिल्या लोकलपासून सर्व प्रवाशांना सकाळी ७ वाजेपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे.

सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत सर्वसामान्य प्रवाशांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करता येणार नाही. या वेळेत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

लोकल प्रवासाची सुविधा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे सुरु करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांमध्ये आवश्यक तो बदल करावा, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. कार्यालयीन वेळा बदलण्यासंदर्भातील आवाहन मुख्य सचिवांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात करण्यात आलेले आहे. या बाबतीतील सूचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळविण्यात आली आहे.

रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना सुरु ठेवण्यात येतील, तसेच रात्री १ वाजेपर्यंत उपहारगृहे सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.