मी गुपित सांगायला सुरुवात केली, तर शेतकरी नेत्यांना कुठे लपायचे ते कळणार नाही – दीप सिद्धू


नवी दिल्ली – दीप सिद्धूने हिंसाचाराला चिथावणी देऊन शेतकरी आंदोलनाला बदनाम केल्याचा संयुक्त किसान मोर्चाने केलेला आरोप फेटाळून लावत सोशल मीडियावरुन त्याने लाईव्ह करुन आपली बाजू मांडली. मी जर गुपित सांगायला सुरुवात केली, तर संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांना कुठे लपायचे ते समजणार नसल्याचे दीप सिद्धू म्हणाला. शेतकरी ट्रॅक्टर मोर्चातील हिंसाचारासाठी अभिनयाकडून सामाजिक कार्यकर्ता बनलेल्या दीप सिद्धूला जबाबदार धरण्यात येत आहे. हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे.

तुम्ही निर्लज्जपणे मला जबाबदार धरत आहात. लोक तुमच्या निर्णयाच्या आधारावर संकल्प करुन, ट्रॅक्टर मोर्चासाठी दिल्लीत आले होते. तुमचा शब्द लोक मानतात. माझ्या नियंत्रणाखाली लाखो लोक कसे राहू शकतात? लाखो लोकांना मी चिथावणी देऊ शकतो, मग तुमचे महत्त्व काय ? दीप सिद्धूला कोणी मानत नाही, त्याचे योगदान नाही. मग लाखो लोकांना घेऊन मी तिथे आलो, हे तुम्ही कसे म्हणू शकता? असा सवाल दीप सिद्धूने केला. सिंघू सीमेच्या जवळ असल्याचे त्याने सोशल मीडियावरुन लाईव्ह करताना सांगितले.

दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारा प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दीप सिद्धूचे नाव आहे. त्याने लाल किल्ल्यावर हिंसाचार झाल्याचे अमान्य केले. निषेधापेक्षा तिथे असलेल्या आंदोलकांना पाठिंब्याची आवश्यकता आहे असे तो म्हणाला.

भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला. दीप सिद्धू याने खरच शेतकऱ्यांना भडकावले का आणि तो कोण आहे, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

पंजाबी गायक दीप सिद्धू याने ध्वज फडकावणाऱ्या शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. दीप सिद्धूने शेतकऱ्यांचे नेतृत्व केले आणि लाल किल्ल्याकडे त्यांना घेऊन गेला. शेतकऱ्यांची लाल किल्ल्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नसल्याचे गुरनाम सिंह चाडूनी यांनी म्हटले आहे. स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू याला लाल किल्ल्यावरील घटनेसाठी जबाबदार ठरवले आहे.