मुंबई : केवळ एका राज्यापुरता कर्नाटकचा प्रश्न मर्यादित नसून तो दोन राज्यांतील सीमाप्रश्न आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना हे कळले पाहिजे. थोडा इतिहास त्यांनी समजून घेतला पाहिजे, असे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आता ठाकरे आहेत, कर्नाटकच्या सरकारने हे सुद्धा आता विसरु नये, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला होता. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी यालाच प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा असल्याचे म्हटले.
यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे काल सांगितले. तेव्हा त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अन्य नेते उपस्थित होते. कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना हे कळाले पाहिजे. थोडा इतिहास त्यांनी समजून घेतला पाहिजे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, जे आमचे कानडी बांधव मुंबई, महाराष्ट्रात राहतात, त्यांच्यावर आम्ही कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे. आम्ही येथे कानडी शाळा चालवतो. कानडी शाळांना आम्ही अनुदान देतो. येथे अनेक कानडी संस्था देखील चालवल्या जातात. पण बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा असे कधी कुणाला म्हणत नाही.
संजय राऊत कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले की, एकदा मुंबईत, महाराष्ट्रात कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी यावे आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी. येथे उद्योग क्षेत्र, हॉटेल क्षेत्रात जे काम करतात, हे सर्वजण आमचेच आहेत. उद्या त्यांचे जर येथे मतदान घेतले, तर ते देखील सांगतील की बेळगाव महाराष्ट्रातच आले पाहिजे.
कर्नाटकचे काही नेते अनेक वर्षांपासून अशाप्रकारचे राजकारण करत आहे. परंतु, कायद्याने काय व्हायचे ते होईलच, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, कर्नाटकच्या सरकारने हे सुद्धा आता विसरू नये. कालची बैठक ही निर्णायक बैठक होती, एवढचे मी सांगतो. ज्या पद्धतीने या विषयावर पावले टाकायला पाहिजेत, ती टाकायचला सुरुवात झालेली आहे. कुणी तिकडे काही बरळले तरी इकडे आम्हाला फरक पडत नसल्याचा इशारा देखील संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला यावेळी दिला आहे.
संजय राऊत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारा प्रकरणी बोलताना म्हणाले की, एकप्रकारची दडपशाही सरकारने सुरु केली आहे. शेतकरी लाल किल्ल्यावर घुसले असे जे म्हणतात, ते खरोखर शेतकरी होते की, कोणीतरी फूस लावली होती. जे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाजपच्या नेत्यांसोबत, जे कोणी सिध्दू वैगरे कोणी आहेत. ते कोण आहेत? त्याचा तपास आधी करा. ते कुठे फरार आहेत?
संजय राऊत पुढे म्हणाले की, पण यापुढे शेतकऱ्यांना सरकारला चिरडून टाकायचे आहे. दडपशाही करायची आहे. त्यातील कारस्थानाचा एक भाग म्हणून, आंदोलनात फूट पाडून त्यातील एक गड जो भाजपच्या नेतृत्त्वाखील आतमध्ये घुसला होता. लाल किल्ल्यावर ते गेले, त्यांनी हडकंप माजवला. यामध्ये जे चित्र निर्माण झाले. आंदोलनात फूट पडली, शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांना बघून घेऊ, अशी भाषा पोलिसांकडून सुरु आहे. ठिक आहे. करुन घ्या, संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे, तुम्हाला उत्तरे द्यावी लागतील.