आजपासून राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु


मुंबई : राज्यातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल दहा महिन्यानंतर आजपासून शाळेची घंटा पुन्हा एकदा ऐकू येऊ लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आले होते आणि आजपासून दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. राज्याच्या शिक्षण विभागातर्फे 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण महापालिका आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत कोरोना परिस्थिती पाहता निर्णय घेण्याची मुभा सरकारने दिली होती. त्यानुसार आज शाळा सुरु झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांना शाळेत पालकांचे संमतीपत्र घेऊनच प्रवेश देण्यात येणार आहे. तशा पालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचे बंधन करण्यात आले आहे. दुसरीकडे शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोरोनाचे नियम पाळणेही बंधनकारक करण्यात आले आहे. शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करणे गरजेचे आहे. विद्यार्थी आणि कमर्चाऱ्यांचे थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटर तपासणी यांसारख्या सुरक्षा उपायांचे पालन शाळांमध्ये करावे लागणार आहे.

मुंबईमध्ये अद्याप शाळा सुरु झालेल्या नाहीत. महानगरपालिकेने 16 जानेवारी रोजी पुढील माहिती मिळेपर्यंत शाळा पुन्हा सुरू न करण्याचे निर्देश दिले आहेत. पण राज्यातील इतर भागांत शाळा आजपासून सुरु करण्यात आल्या आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, पालघरमध्ये आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत.

आजपासून पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण सुरक्षेचे सगळे निकष पूर्ण करणाऱ्या 60 ते 65 शाळाच आज पहिल्या दिवशी सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बुलढाण्यातील 5वी ते 8वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. शहरातील शारदा ज्ञानपीठ या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर करण्यात येत आहेत. पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, तसं पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश नसल्याचं शिक्षक सांगत आहेत.

आजपासून नाशिक जिल्ह्यातील 2825 शाळा खुल्या करण्यात आल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसह शाळा प्रशासनाकडूनही सर्व खबरदारी घेतली जात आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. मधली सुट्टी होणार नसल्याने विद्यार्थ्यांना घरूनच जेवण करून शाळेत यावे लागणार आहे. दरम्यान शाळा ऑफलाईन सुरु झाल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गाकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.