लाल किल्ल्यातील हिंसाचारावरुन भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे मोठे वक्तव्य


नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. पण या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी या हिंसाचारानंतर लाल किल्ल्यात शिरून मोठी तोडफोड केली. त्याचबरोबर पोलिसांनाही मारहाण केल्याचे समोर आले. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याच पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य केले आहे.

जो हिंसाचार लाल किल्ल्यावर झाला, त्यामागे ‘पीएमओ’च्या जवळील भाजप नेत्याचा हात असल्याचा संशय सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचा आधार घेत सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, दबक्या आवाजात एक चर्चा सुरू आहे. कदाचित त्यात काहीही तथ्य नसेल. ते खोटेही असू शकेल किंवा शत्रूंच्या आयटी सेलकडून वावड्या उठवल्या जात असतील की, लाल किल्ल्यावरील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे काम ‘पीएमओ’च्या जवळील व्यक्तीने केले. नीट तपासून माहिती घ्यावी, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजप खासदार सनी देओल यांच्या निवडणूक प्रचारात शेतकरी आंदोलनातील हिंसाचारात सामील असलेला आरोपी दीप सिद्धू हा सहभागी झाला होता, अशा आशयाचे ट्विटही सुब्रमण्यम स्वामी यांनी रिट्विट केले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिले आहे.

राज्यसभेचे सदस्य असलेल्या खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक ट्विट केले असून त्यामध्ये, दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची प्रतिमा डागाळल्याचे मत सुब्रमण्यम स्वामी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर पंजाबमधील काँग्रेस सरकारवरही त्यांनी जोरदार टीका केली.