कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा : उद्धव ठाकरे


मुंबई : ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प’ या शासकीय पुस्तकाचे आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी बोलताना कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा भाग आहे. कर्नाटक सरकार उर्मटपणे वागत आहे. हे प्रकरण न्यायालयात असताना आधी बेळगावला ज्या पद्धतीने उपराजधानी बनवली, मग नामांतर केले हा न्यायालयाचा अपमान नाही का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, हे सरकार एकतर तुमच्या पाठीशी आहे. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांच्यासोबत बैठक आहे. कायद्याचा विचार कर्नाटक सरकार करत नाही. तेवढ्यापुरता हा विषय बोलायचा असतो. मुख्यमंत्री कोणीही असो मराठींवर अन्याय करतात. हा भाग महाराष्ट्रात आणायचा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत बोलताना म्हणाले की एक दिलाने लढलो तर हा प्रश्न सुटेल. यावर पवारसाहेबांनी काम केले आहे. न्यायालयात हा प्रश्न असेपर्यंत हा भाग केंद्रशासित का करत नाही? कर्नाटक सरकार न्यायालयात बेलगाम वागत आहे. हा भाग केंद्रशासित झाला पाहिजे, यात कर्नाटक सरकारची मस्ती चालू देणार नाही, असे आपण न्यायालयात सांगितले पाहिजे.

मराठी एकीकरण समिती तुटली कशी? मराठीदुहीचा शाप आहे. अनुभवाचे फटके पडले आता मराठी अस्मिता एकत्र आणत नाही, तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. संघराज्याचे स्वप्न आहे. भाषावार प्रांतरचना झाली, पण महाराष्ट्रातील मराठी माणसे आपल्यापासून दूर केली. अत्याचार झाला तर आम्ही तोडून मोडून टाकणार. मराठी आमदार निवडून आले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. मराठी महापौर निवडून आले, पण काही केले तर ते देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतात. मातृभाषेसाठी लढला तर राजद्रोह? आजपासून नवीन सुरुवात करुया. मतभेद झाले तर गाडून टाका. जोपर्यंत हा भाग महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, ही प्रतिज्ञा घेऊया, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.