केंद्र सरकारने जपानच्या माजी पंतप्रधानांना पद्मश्री पुरस्कार बुलेट ट्रेनमुळे दिला असावा – संजय राऊत


मुंबई – केंद्र सरकारने पद्म पुरस्काराची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा केली. यात महाराष्ट्रातील फक्त 6 जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली असून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भारताला जपानने बुलेट ट्रेन दिली आहे. त्यांच्या माजी पंतप्रधानांना त्याबद्दल पद्म पुरस्कार देण्यात आला असावा, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केली आहे.

पद्म पुरस्कारावरून केंद्र सरकारवर संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, पद्मश्री पुरस्कार ज्यांना मिळाले ते लायक असतील मी त्यांचे स्वागत करतो. एवढे मोठे राज्य आहे, एवढे लोक काम करतात, पण राज्यातील फक्त 6 लोकांना पुरस्कार लोकांना मिळाला आहे. 10 ते 12 लोकांना दरवर्षी हा सन्मान देण्यात येतो आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त 6 पुरस्कार? असा संतप्त सवाल राऊत यांनी विचारला. काही नावांची शिफारस राज्य सरकारकडून केली जाते. ज्या सहा जणांना पुरस्कार देण्यात आले आहे, मला वाटते त्यातील एक ही नाव यादीतील नसेल, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान यावेळी राऊत जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पुरस्कार देण्याबाबत प्रश्न विचारला असता म्हणाले की, आपल्याला जपानने बुलेट ट्रेन दिली आहे. त्यांना त्याबद्दल पुरस्कार देण्यात आला असावा, महाराष्ट्राने ती बुलेट ट्रेन नाकारल्याचे त्यांनी सांगितले.