दिल्लीतील ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचाराला भाजपचे पोलिसच जबाबदार – अशोक ढवळे


मुंबई – शेतकरी नेते अशोक ढवळे यांनी दिल्लीतील ट्रॅक्टर मार्चदरम्यान झालेल्या हिंसाचाराला भाजपचे पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांनी हिंसा केलेली नाही, जी काही हिंसा झाली ती पोलिसांनी केली आहे. ती सुद्धा भाजपच्या सरकारच्या सांगण्यावरुन झाली असल्याचेही ढवळे यांनी म्हटले आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शेतकरी नेते अशोक ढवळे म्हणाले, आता मी स्वतः दिल्लीमध्ये आहे. जी ट्रॅक्टर परेड शहाजहांपूर सीमेवरुन निघाली आहे, ती शांततेत सुरु आहे. बहुतेक ठिकाणी मोठ-मोठ्या परेड निघाल्या, तिथे अशी हिंसा झालेली नाही. जी हिंसा आता झाली त्याला पूर्णपणे केंद्र सरकारचे पोलीस जबाबदार असल्याचे आमचे स्पष्ट म्हणणे आहे.

शेतकऱ्यांनी हिंसा केलेली नाही, जी काही हिंसा झाली ती पोलिसांनी केली आहे. ती सुद्धा केंद्रातील मोदी सरकारच्या सांगण्यावरुन झालेली आहे. शेतकरी आंदोलनाला सरकारला पहिल्यापासून गालबोट लावायचे आहे. त्यांनी आंदोलनाची बदनामी केली, दमनशाही केली. हे करुनही सरकारची काहीही चालले नाही. त्यानंतर त्यांनी हे एक शेवटचे अस्त्र बाहेर काढलेले आहे. खरे म्हणजे दिल्लीमध्ये किंवा देशात कुठेही शांततापूर्ण निदर्शने करण्याचा घटनात्मकरित्या प्रत्येक नागरिकाला अधिकार असल्याचा आरोपही ढवळे यांनी केला आहे.