४० शेतकरी संघटनांचा दावा; दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसा करणारे घुसखोर होते


नवी दिल्ली – दिल्लीमध्ये आज कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीला अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले. पण संयुक्त किसान मोर्चाने या हिंसेचा निषेध केला आहे. आज ट्रॅक्टर परेड मागील दोन महिन्यांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाअंतर्गत काढण्यात आली होती. दिल्लीतील आयटीओ, लाल किस्सा, नांगलोई, सिंघू, टिकारी बॉर्डर आणि इतर ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी यामध्ये हिंसा केल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल संयुक्त किसान मोर्चाने जारी केलेल्या वक्तव्यामध्ये त्यांचे आभार मानले आहेत. पण याच आंदोलनामध्ये झालेल्या हिंसक घटनांचा निषेध करत आहे. जे लोक या घटनांसाठी जबाबदार आहेत त्यांचा संयुक्त किसान मोर्चाशी काहीही संबंध नसल्याचेही शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.

घडलेल्या हिंसेदंर्भातही शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ४० शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने भाष्य केले आहे. काही संघटना आणि व्यक्तींनी आमच्या सर्व प्रयत्नानंतरही नियोजित मार्गाचे आणि नियमांचे उल्लंघन केले आणि त्यांनी निंदनीय कृत्य केली. शांततापूर्ण आंदोलनामध्ये असामाजिक तत्वांनी घुसखोरी केली. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आम्ही नेहमीच ठरवले आहे. आमची सर्वात मोठी ताकद शांतता आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करुन आंदोलनाला नुकसान पोहचू द्यायचे नसल्याचा आमचा हेतू आहे.

शेतकरी नेत्यांनी जारी केलेल्या वक्तव्यामध्ये हा संघर्ष सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचा सुरु असल्याचे म्हटले आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून आंदोलन करत असून त्यामुळेच आजसारखी परिस्थिती निर्माण झाली. आमच्याशी नियमांचे उल्लंघन करुन हिंसा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचा काहीही संबंध नाही. आम्ही सर्व शेतकऱ्यांना सर्वांनी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे आणि ध्येयाने आंदोलन करण्याचे आवाहन करतो. कोणत्याही प्रकारची हिंसक घटना, राष्ट्रीय स्मारकांना पोहचवलेली हानी आणि इतर गोष्टींचा आमच्या मोर्चाशी काहीही संबंध नाही. असे करणाऱ्यांपासून मोर्चातील शेतकऱ्यांनी दूर रहावे असेही संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.

आज नक्की काय काय घडले यासंदर्भातील माहिती आम्ही घेत असल्याचेही संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे. लवकरच संपूर्ण चित्र यासंदर्भात स्पष्ट होईल, अशी अपेक्षाही मोर्चाने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी घडलेली हिंसा वगळता नियोजित पद्धतीने आंदोलन सुरु असल्याचेही संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.