जशी गायीची पूजा करता तशीच शेतकऱ्यांची देखील पूजा करा : अबू आझमी


मुंबई – मुंबईतील आझाद मैदानात नव्या कृषी कायद्यांविरोधात संयुक्त शेतकरी किसान मोर्चा धडकला आहे. मुंबईतराज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारचे नेते देखील या मोर्चाला संबोधित करण्यासाठी उपस्थित आहेत. यासोबतच शेतकरी मोर्चाला पाठिंबा देत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.

यावेळी अबू आझमी यांनी शेतकरी आंदोलकांकडून सुरू असलेल्या लढाईचं आणि त्यांनी दाखवलेल्या मनोधैर्याचे कौतुक केले. जशी तुम्ही गायीची पूजा करता तशी शेतकऱ्यांची देखील पूजा करायला हवी. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायलाच हवे. शेतकऱ्यांना संपविण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत असल्याचे अबू आझमी यावेळी म्हणाले.

अनेक राजकीय नेते आणि शेतकरी नेते आझाद मैदानातील मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सुनील केदार, जितेंद्र आव्हाड, तिस्ता सेटलवाड, अशोक ढवळे आणि शेकापचे जयंत पाटील उपस्थित आहेत.

आपल्या भाषणात अबू आझमी यांनी शेतकरी आंदोलकांना मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी प्रोत्साहन केले. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या जाचाला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. यानिमित्ताने मी पंजाब, हरियाणासह देशातील सर्वच शेतकऱ्यांचे अभिनंदन करू इच्छितो आणि माझ्या शेतकरी बांधवांनी आणखी तीव्रतने सरकारला आपले महत्व पटवून द्यावे, असे अबू आझमी म्हणाले.