मुंबईतील शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट – रामदास आठवले


मुंबई – नाशिकहून मुंबईत शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात राजभवनवर मोर्चासाठी दाखल झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले. पण किसान सभेने या निमित्ताने मुंबईत केलेले हे आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. मुंबईत किसान सभेने आंदोलन करण्याची गरज नसल्याचेही आठवलेंनी म्हटले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने यावरुन आठवलेंवर टीका केली असून आपल्या या वक्तव्यासाठी आठवलेंनी माफी मागावी, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना आठवले यांनी मुंबईतील शेतकरी आंदोलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर हे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे म्हटले आहे. जे कृषि कायदे केंद्र सरकारने केले आहेत, ते मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांनी आता आंदोलन थांबवायला हवे, असे आठवले यांनी म्हटले आहे. आठवलेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

सध्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती दिली आहे. तसेच दोन वर्षांसाठी हे कायदे लागू न करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांसमोर ठेवला असल्याची आठवणही आठवले यांनी करुन दिली आहे. याच दोन गोष्टींचा संदर्भ देत आठवलेंनी पुढे हे आंदोलन केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी करण्यात आल्याचा टोला केंद्र सरकारला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांचे नाव न घेता लगावला आहे. शेतकऱ्यांच्या भल्याचा केंद्र सरकार हे विचार करत असून त्यांना न्याय मिळून देण्यासाठी काम करत असल्याचेही आठवलेंनी म्हटले आहे. आता सरकारचे शेतकऱ्यांनी ऐकून घ्यायला हवे आणि आंदोलन थांबवायला हवे, असेही आठवले म्हणाले आहेत.