गोव्याला मजा मारायला गेले राज्यपाल, शेतकरी नेत्यांनी सर्वांसमक्ष फाडले निवेदन


मुंबई – आज दुपारी चार वाजताची वेळ आम्हाला राज्यपालांनी भेटीसाठी दिली होती. तरीही वाटण्याच्या अक्षता दाखवत गोव्याला मजा मारायला राज्यपाल निघुन गेले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गांभीर्य नसलेल्या राज्यपालांचा आम्ही निषेध करत असल्याचे म्हणत संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी राज्यपालांना देण्यात येणारे निवेदन सर्वांसमक्ष फाडून निषेध व्यक्त केला आहे.

संयुक्त किसान सभेचा हजारो शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा मोर्चा आज नव्या कृषी कायद्यांना विरोध करत मुंबईत दाखल झाला होता. सर्व शेतकरी नेते आणि राजकीय मंडळींची आझाद मैदानावर भाषणे झाल्यानंतर राजभवनाच्या दिशेने कूच करण्यासाठी मोर्चा निघाला. पण मुंबई पोलिसांनी मोर्चाला मेट्रो सिनेमाजवळ अडवले आणि राजभवनावर जाण्यास मज्जाव केला. मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला राजभवनावर जाऊन राज्यपालांच्या अधिकऱ्यांना निवेदन देता येईल. राज्यपाल सध्या मुंबईत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शेतकरी नेत्यांनी यावर संताप व्यक्त केला. राज्यपालांना भेटण्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या २३ सदस्यांच्या शिष्टमंडळाने यावेळी चर्चा करुन राज्यपालांना निवेदन न देण्याचे ठरवले होते. त्याचबरोबर इतरही महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.

आज पायपीट करत शेतकरी मुंबईत आले. आम्ही दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठीच्या पाठिंब्याचे निवेदन राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्याची विनंती करणार होतो. पण ऐनवेळी राज्यपालांनी गोव्याला पळ काढला आहे. ही अशी राज्यपालांची चलाखी इतर राज्यात चालेल पण महाराष्ट्रात हे चालणार नाही. राज्यपालांच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो, असे अजित नवले म्हणाले.

भेटीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल उपलब्ध नसल्याने आता शेतकऱ्यांचे निवेदन थेट राष्ट्रपतींना देणार असल्याचे यावेळी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. तत्पूर्वी, आज राज्यपालांना देण्यासाठी आणलेले निवेदन अजित नवले, अशोक ढवळे, भाई जगताप, विद्या चव्हाण, सचिन सावंत इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत फाडून टाकण्यात आले.

हे नवे कृषी कायदे देशातील केवळ दोन उद्योपतींच्या दबावामुळे लागू केले जात असल्यामुळे या दोन्ही उद्योगसमूहांच्या उत्पादनांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची घोषणा आणि आवाहन यावेळी करण्यात आले. अदानी आणि अंबानींना धडा शिकवण्यासाठी आपल्याला लोकशाही मार्गाने त्यांच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन मी करतो. जिओचे सिमकार्ड सर्वांनी इतर मोबाइल कंपन्यांमध्ये पोर्ट करुन घ्यावे. तसेच अदानी, अंबानींच्या पेट्रोल पंपांवर अजिबात इंधन भरू नये, असे अशोक ढवळे यावेळी म्हणाले.