दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर जनसांसद कार्यक्रमादरम्यान काँग्रेस खासदारावर प्राणघातक हल्ला


नवी दिल्ली – जनसांसद कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी गेले असता काँग्रेस खासदार रणवीत सिंह बिट्टू यांच्यावर हल्ला करण्यात आला असून रणवीत सिंह बिट्टू यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांची पगडीही खेचण्यात आली. दरम्यान रणवीत सिंह यांनी आपल्यावरील हा हल्ला प्राणघातक असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यासोबत यावेळी अमृतसरचे खासदार गुरजीत सिंह आणि आमदार कुलबीर सिंह उपस्थित होते. तसेच त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे.

फेसबुकच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती रणवीत सिंह यांनी दिली आहे. काही असामाजिक तत्वे ज्यांचा हेतू अस्पष्ट आहे त्यांनी आम्हा तिघांवर प्राणघातक हल्ला करुन परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा रणवीत सिंह यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत जंतर मंतरवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांचे नातू असणारे रणवीत सिंह, गुरजीत सिंह आणि कुलबीर सिंह आंदोलन करत आहेत. रणवीत सिंह यांनी केलेल्या दाव्यानुसार, काही लोकांना त्यांना मारहाण केली, तसेच पगडी खेचली. हा प्राणघातक हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संतप्त आंदोलकांनी रणवीत सिंह यांना धक्काबुक्की देखील केली. कुलबीर सिंह यांची पगडीदेखील या झटापटीत निघाली. रणवीत सिंह यांना वाचवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या वाहनांपर्यंत सुरक्षितपणे नेले. रणवीत सिंह गाडीत बसल्यानंतरही काहीजणांनी काठ्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. दरम्यान रणवीत सिंह यांच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान फेसबुक पोस्टमध्ये आपण सध्या ठीक असल्याचे रणवीत सिंह यांनी सांगितले आहे. या हल्ल्यामागे शेतकरी असण्याचा प्रश्नच नाही, कोणीतरी जाणुबुजून हा हल्ला केल्याचा आरोप नेत्यांकडून करण्यात आला आहे.