केंद्र सरकारने तयार केलेले कृषी कायदे रद्द होणार नाहीत – गिरीश बापट


पुणे – भाजप खासदार गिरीश बापट यांनी राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर वाटत नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही या राज्यात काम करत आहोत आणि तसेच काम करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी यावेळी कृषि कायदे रद्द होणार नाहीत, पण त्यामध्ये काही सुधारणा केल्या जातील असेही त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

हे सरकार काही अस्थिर असल्याचे मला वाटत नाही. त्यांचे तेच आपसूक पडेल, हे सरकार जेव्हा पडेल तेव्हा पडेल. पडले नाही तरी आम्हाला त्याचे काही देणे घेणे नाही. राज्यात आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत आहोत आणि तसेच काम करत राहणार असल्याचे गिरीश बापट यांनी यावेळी म्हटले.

केंद्र सरकारने तयार केलेले कृषी कायदे रद्द होणार नाही. पण त्यामध्ये काही सुधारणा केल्या जातील. तसेच ते कायदे मागे देखील घेतले जाणार नाही यावर सरकार ठाम आहे. शेतकर्‍यांच्या जीवनात बदल घडविण्याच्या दृष्टीने हे कायदे करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. डाव्या विचारसरणीचे लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. हे काम सरकार अस्थिर करण्यासाठी केले जात आहे. आपल्या राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील काही विरोधी पक्ष या माध्यमातुन देशात अशांतता निर्माण करण्याचे काम करीत आहे. हे योग्य नसून आंदोलन शांततेच्या मार्गाने केले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मुंबईत आज होत असलेल्या आंदोलनात शरद पवार सहभागी होत आहेत. अशाच कायद्याचे विचार त्यांनी देखील अनेकवेळा मांडलेले आहेत. त्यांच्या मूळ विचारला तेच विरोध करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात जे होते. तेच आम्ही मांडत असल्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि देशातील विरोधी पक्ष विरोध करत आहेत, त्यांनी असे करू नये. यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागेल, अशी भीती त्यांनी बोलून दाखवली.