26 जानेवारीला राजभवनावर धडकणार किसान सभेच्या नेतृत्त्वातील शेतकरी मोर्चा


मुंबई : मुंबईकडे अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाने कूच केली असून ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. हा मोर्चा 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा धडकणार आहे. गेल्या 60दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्रात या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे.

आज दुपारी मुंबईतील आझाद मैदानात नाशिकच्या ईदगाह मैदानापासून निघालेला किसान सभेचा मोर्चा येऊन पोहचणार आहे. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल होणार आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी या मोर्चासाठी सहभागी होत असल्याची माहिती किसान सभेच्या वतीने देण्यात आली आहे. मुंबईतील आझाद मैदानात देखील या संपूर्ण पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या अनेक तुकडे देखील मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत.

मुंबई पोलिसांकडून अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरा यांचा देखील वापर करण्यात आला आहे. मुंबईत आज आझाद मैदानात मोर्चा दाखल झाल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानात भाजप सोडून इतर सर्व पक्षातील नेते एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला यावेळी विरोध करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते यामध्ये उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारच्या या धोरणाला सकाळी 11 वाजता विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेने कूच करणार आहे.