आपल्या देशाची लाईफलाइन म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. आपल्यापैकी बहुतांश जणांनी रेल्वेमधून आयुष्यात एकदा तरी प्रवास केलेलाच असतो. या प्रवासा दरम्यान काही डब्बे अगदीच जुने झालेले असल्याचे आपण पाहिले असेलच आणि अशा जुन्या गचाळ डब्यात प्रवास करण्याची कोणाचीही इच्छा नसते.
जवळपास ३० वर्षे भारतीय रेल्वे खात्याच्या गाड्यांचे डबे हे वापरले जातात. तर काहींची दुरुस्ती करून ते जास्त काळही वापरले जातात. पण ज्या डब्यांची आयुर्मर्यादा पूर्ण झाली असेल त्या डब्यांचे काय होते, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? पण आम्ही आज तुम्हाला अशा डब्यांचे नेमके काय होते याची माहिती देणार आहोत.
अनेक कामांसाठी रेल्वे या जुन्या डब्यांचा वापर करत असते. पण यांचा वापर प्रामुख्याने दोन कामांसाठी करत असते. त्यापैकी पहिले काम म्हणजे, हे डबे मॉडिफाय करून असे तयार केले जातात की ते पुन्हा प्रवासासाठी वापरता येतील आणि दुसरा वापर म्हणजे, या जुन्या डब्यांना कर्मचाऱ्यांचे घर बनवले जाते.
आपल्या घरापासून दूर राहून जे कर्मचारी काम करतात या डब्यांनाच त्यांच्यासाठी त्यांचे घर बनवले जाते. कॅम्प कोचेस अशा घरांना म्हटले जाते. रेल्वेच्या इंजिनीअरींग विभागाअंतर्गत काम करणारे कॅम्प कोचेसमध्ये राहणारे सर्व कर्मचारी असतात. या लोकांना अनेकदा कामाच्या निमित्ताने अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार या कोचेसमध्ये फ्रिज, कुलर, टिव्ही, बेड अशा सामानाची व्यवस्थाही केली जाते. रेल्वेच्या मोठ्या अधिकाऱ्यांची व्यवस्था करायची असेल तर अशा कॅम्प कोचेसमध्ये एसीही लावला जातो.