आनेवाडी टोल नाका हस्तांतर आंदोलन प्रकरणी उदयनराजेंची निर्दोष सुटका


वाई – भाजप खासदार उदयनराजे व इतर ११ समर्थकांची वाई न्यायालयाने आज आनेवाडी (ता. वाई) टोलनाका येथील टोल हस्तांतर आंदोलन प्रकरणी निर्दोष मुक्तता केली. आनेवाडी टोल नाका येथे खासदार उदयनराजे यांच्यासह अशोक सावंत, अजिंक्य मोहिते, मुरलीधर भोसले, सनी भोसले, सुजित आवळे, राजू गोडसे, किरण कुराडे, इम्तियाज बागवान, बाळासाहेब ढेकणे, विवेक उर्फ बंडा जाधव आदींनी ५ ऑक्टोबर २०१७ रोजी संध्याकाळी सहा वाजता जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले होते.

२५० जणांचा बेकायदेशीर जमाव आनेवाडी टोल नाका येथे जमवून टोलनाक्यावरील स्थानिक कामगारांचा व दिवाळी बोनसचा मुद्दा तसेच टोल वसुलीचा अधिकार कोणाला देणार नसल्याचे सांगत टोल हस्तांतरणास विरोध केला होता. टोलनाक्यावर यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. टोलनाका परिसरात या सर्व घटनेमुळे तणावपूर्ण वातावरण झाले होते. यामुळे तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भुईज पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनाजी तानाजी कदम यांनी याबाबत पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याची तक्रार दाखल केली होती. न्यायालयात या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता. वाई येथील न्या एम एन गिरवलकर यांच्या न्यायालयात त्याची सुनावणी झाली.

सहा साक्षीदार सुनावणीदरम्यान तपासण्यात आले. उदयनराजे व त्यांच्या ११ सहकाऱ्यांची अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. खासदार उदयनराजे व त्यांचे सर्व सहकारी सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित होते. सरकारी पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी तर उदयनराजे व इतरांच्या वतीने वकील ताहेर मनेर यांनी काम पाहिले. उदयनराजे यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.