कसोटी संघाचे नेतृत्व विराट ऐवजी रहाणेनेच करावे – बिशन सिंग बेदी


नवी दिल्ली – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला समजला जाणाऱ्या गाबाच्या मैदानावर विजयी पताका फडकवली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाली भारतीय संघाने १९ जानेवारी २०२१ रोजी कांगारुचा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिका खिशात घातली. अनेक दिग्गजांनी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या माणहानीकारक पराभवाचे भाकित वर्तवले होते. त्या सर्व टीकाकारांना हे एक खणखणीत उत्तर असून रहाणेने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत यशस्वीरित्या भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाबाबात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणेला भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी कौल दिला आहे.

इंडियन एक्स्प्रेसला लिहिलेल्या आपल्या लेखात बिशन सिंग बेदी यांनी अजिंक्य रहाणे आणि संघाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. बेदी आपल्या लेखात म्हणतात की, अजिंक्य रहाणेला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जवळून पाहिले आहे. कुशल कर्णधाराची सर्वात मोठी बाब म्हणजे, तो आपल्या गोलंदाजाचा कसा वापर करतो. मी याबाबतीत रहाणेचा मोठा चाहता झालो आहे.

एखाद्या कर्णधाराचे निरिक्षण करण्यास तीन कसोटी सामने पुरेशा आहेत. त्याने या कसोटी मालिकेत केलेल्या गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षणाची केलेली योग्य प्लेसमेंट यावरुनच त्याचे कुशल नेतृत्व दिसून येते. मी रहाणेच्या चुका शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने आखलेल्या सर्व योजना व्यवस्थित आढळल्यामुळे त्याच्या नेतृत्वात मला कोणतीही उणीव जाणवली नसल्याचे बेदी म्हणाले.

भारतीय गोलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात आधिक प्रभावी म्हणून समोर आल्याचे मला वाटते, असे माजी भारतीय कर्णधार बिशन सिंग बेदी आपल्या लेखात म्हणाले. ते पुढे म्हणाले की, रहाणेचे नेतृत्व पाहून मज्जा आली. अशा परिस्थितीत भारतीय कसोटी संघाच्या नेतृतासाठी माझी पहिली पसंती अजिंक्य रहाणेलाच असेल. पण भारतीय संघाचा कर्णधार कोण असावा हे मी ठरवू शकत नाही, तो निर्णय बीसीसीआयने घ्यावा. विराट कोहलीला एक दिग्गज फलंदाज म्हणून खेळवणार? की साधारण कर्णधार म्हणून ? हा निर्णय क्रिकेट मंडळाचा आहे.

कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला करायला हवा. मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना नेतृत्व द्यावे, असे मला वाटते. कदाचित विराट कोहली अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी नेतृत्व ऑफर करु शकतो. जर असे झाले तर भारतीय क्रिकेटसाठी हा निर्णय चांगला असेल.