खोटे आरोप केल्याप्रकरणी रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करा – भाजप नेत्याची मागणी


मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप धक्कादायक होता आणि ज्यापद्धतीने त्यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली ते देखील तेवढेच धक्कादायक आहे. बलात्काराचा गंभीर आरोप करुन नंतर तक्रार मागे घेतल्यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलेल, त्यामुळे खोटे आरोप केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

रेणू शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतल्याचे वृत्त येताच ट्विटरवर व्हिडिओ पोस्टद्वारे चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. खोटे आरोप करणे, खोटे गुन्हे दाखल करणे चुकीचेच आहे. राजकीय कार्यकर्ता असूदे किंवा सामान्य माणूस खोट्या आरोपांमुळे तो उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, आणि अशाप्रकारे जर महिला खोटे आरोप-गुन्हे दाखल करत असतील, तर त्यामुळे खऱ्या पीडित महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो…हे समाजाच्या हिताचे नसल्यामुळे मुंबई पोलिसांनी खोटे आरोप लावणाऱ्या रेणू शर्मावर तात्काळ IPC192 नुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.