प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्यापूर्वीच नाना पटोले यांची स्बबळावर सत्तेत येण्याची भूमिका


मुंबई – लवकरच मोठे बदल राज्यातील काँग्रेस पक्षात होण्याची शक्यता असून नव्या प्रदेशाध्यक्षाची बाळासाहेब थोरात यांच्या जागी निवड अंतिम मानली जात आहे. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्यावर असल्याने त्यांच्यावरी भार कमी करण्याच्या हेतूने दुसऱ्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्ष सोपवले जात असल्याचे सांगितले जात आहे. तसे संकेतही बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले होते. दरम्यान नाना पटोले यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत आघाडीवर आहे. त्यांनी याबाबत सूचक वक्तव्यही केले आहे. पण नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.

सत्तेपासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून तिन्ही पक्ष पुढील निवडणुकांमध्येही एकत्र असतील, असे वारंवार तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितले जात असताना नाना पटोले यांनी राज्यात स्वबळावर पक्ष सत्तेत कसा येईल, असे सांगत सूचक वक्तव्य केले आहे.

नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या पक्षात आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केले जाईल.