पुण्यातील भाजप नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवारांचे सूचक वक्तव्य


पुणेः संपूर्ण देशात मागील काळात नरेंद्र मोदी यांचा झंझावात पाहायला मिळाला. भाजपचे सरकार या भारतात त्या एकट्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आले आणि अनेक राज्यही त्याच नेत्याच्या नावाखाली त्यांच्या ताब्यात गेली. तशा अनेक महापालिकाही गेल्या. पण आता परिस्थिती बदलली असल्याचे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

पुण्यातील भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. महापालिका निवडणुकाजवळ येत असतानाच नगरसेवक पक्षांतर करत असल्याच्या चर्चेने पुण्यातील राजकारणही तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याच पार्श्वभूमीवर एक सूचक वक्तव्य केले आहे.

वारे बदलते तसे काहीजण बदलत असतात, मागे आमचे सरकार गेल्यानंतर भाजपमध्ये आमच्यातील काही जण गेले. पक्ष बदलणाऱ्यांना नेत्यांना पक्षनिष्ठा वगैरे काहीही नसते, त्यांच्यात कदाचित एक ध्येय असते आपल्या प्रभागाचा व गटाचा विकास व्हावा. पण कामे कशी होणार सत्ताधारी पक्षातून निवडून आले तरच कामे होतील. म्हणून जर त्यावेळी गेले असतील आणि आता जर वेगळा विचार करुन परतत असतील तर त्यांचे कारण फक्त स्वार्थ नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

सामाजिक क्षेत्रात एखादा राजकीय व्यक्ती काम करत असताना त्याचे नाव लोकांमध्ये चांगले होण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. पण असा कोणी आरोप केला तर एका झटक्यात त्याची बदनामी होते. हा मुद्दा हाताशी विरोधक ठेवतात. राजीनामाच्या मागणी होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणी ज्यांनी केली, ते काय उत्तर देणार, असा सवाल त्यांनी अजित पवारांनी केला आहे. मुंडेचे कुटुंब आरोपांमुळे अडचणीत आले. घरातील वडिलधाऱ्यांना त्रास झाला, याला कोणी वाली आहे की नाही. यात पक्षाचीही बदनामी झाल्याचेही ते म्हणाले.