महावितरणाच्या निर्णयावरुन रोहित पवारांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर


मुंबई – राज्यात ६३ हजार ७४० कोटी थकबाकी वीज बिलांची असून, त्यातच आता ग्राहकांनी जर वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे महावितरणने म्हटले आहे. परिणामी महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

पवार म्हणाले की, वाढीव वीजबीलाची शाहनिशा करण्याची गरज असून वाढीव आलेले वीज बील कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढेच बील द्यावे. यासाठी सरसकट धोरण करता येईल का याचा अभ्यास राज्य सरकारने करावा, असे मला वाटते. कोरोनाकाळात वीजेचा अतिरिक्त वापर झाला असेल, पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल. ग्राहकांना आलेल्या बिलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला याचा अहवाल एमएसईबीने काढला आहे का? तो अहवाल काढण्याबाबत आदेश काढले आहेत का?, असा सवालही पवारांनी सरकारला विचारला आहे. तसेच सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत नक्की पोहचवणार असल्याचे आश्वासनही रोहित पवारांनी यावेळी दिले.