प्लास्टिक, कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्याचे आवाहन


मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले, मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्ततः पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तहसिल कार्यालयात व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना सुपूर्द करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडील परिपत्रकान्वये प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात असे सूचित केले आहे. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हास्तरावर व अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुकास्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकान्वये देण्यात आली आहे.