भारताची शेजारील सहा देशांना कोरोना लसींचा पुरवठा


नवी दिल्ली : शेजारधर्म पाळत शेजारील देशांना भारताने कोरोना लसींचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना लसींची पहिली खेप सुद्धा भारताकडून भूतान आणि मालदीवला पाठवण्यात आली आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीचे एक लाख डोस एअर इंडियाच्या विमानातून मालदीव येथे पोहोचले आहेत. तर भूतानसाठी कोव्हिशिल्ड लसींचे दीड लाख डोसेस पाठवण्यात आले आहेत. मालदीवचे माजी पंतप्रधान मोहम्मद नशीद यांनी भारत सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे मोहम्मद नशीद यांनी ट्विट करुन आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, कोरोना लसींचे एक लाख डोस भारत सरकारने पाठवले आहेत. भयानक अशा विषाणूपासून मुक्त होण्याच्या दिशेने मालदीवची ही एक सुरुवात आहे. आपला विश्वासू मित्र असलेल्या भारताने १९८८ मध्ये लष्करी उठाव, त्सुनामी, जलसंकट आणि कोरोना विषाणूच्या संकटात सर्वप्रथम मदत केली आहे.

तर, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ट्विट करुन म्हटले, शेजारील आणि सहकारी देशांना भारताने कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा सुरू केला आहे. पहिली खेप भूतानसाठी निघाली आणि मालदीवसाठीही कोरोना लसीची खेप निघाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी म्हटले होते की, भारत आपल्या शेजारील भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स यांना कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करणार आहे.

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते की, जागतिक समुदायाच्या आरोग्याच्या गरजा भागविण्यासाठी भारत विश्वासू सहकारी म्हणून मदत करत असल्याचा अभिमान वाटत आहे. लसींचा पुरवठा बुधवारपासून सुरू होईल आणि येत्या काही काळात आणखी लसींचा पुरवठा केला जाईल. सर्वात मोठ्या लस उत्पादक देशांपैकी भारत एक महत्वाचा देश आहे. कोरोना लस खरेदी करण्यासाठी भारतासोबत अनेक देशांनी संपर्क साधला आहे.