कर्नाटकातील भाजप मंत्र्याचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य


बंगळुरु – दिल्लीत मागील महिन्याभरापासून नव्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांचा मुद्दाही सातत्याने चर्चेत येत आहे. अशात शेतकऱ्यांच्या बाबत भाजपचे कर्नाटकातील कृषी मंत्री बी.सी. पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. जे शेतकरी आत्महत्या करून स्वतःच आयुष्य संपवतात, ते मनाने कुमकुवत असतात. त्यासाठी सरकारला दोष देता येणार नसल्याचे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वादंग होण्याची शक्यता आहे.

मैसूर येथे पत्रकार परिषदेत कर्नाटकचे कृषी मंत्री बी.सी. पाटील बोलत होते. त्यांनी यावेळी शेतकरी आत्महत्यावर भाष्य करताना हे वक्तव्य केले. सरकारची धोरणे शेतकऱ्याकडून घेतल्या जाणाऱ्या या टोकाच्या निर्णयाला कारणीभूत नाहीत. फक्त शेतकरीच नाही, तर उद्योजकही आत्महत्या करून जीवन संपवतात. सर्वच आत्महत्यांना शेतकरी आत्महत्या म्हणू शकत नसल्याचे कृषी मंत्री पाटील म्हणाले.

पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांविषयी असेच एक विधान केले होते. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा विचार न करता, जे शेतकरी आपले आयुष्य संपवतात, ते घाबरट असतात. आत्महत्या करणारे शेतकरी भेकड असतात. पत्नी आणि मुलांचा सांभाळ करू न शकणारे भेकड असतात. तेच आत्महत्या करतात. जर आपण पाण्यात पडलो आहोत, तर आपल्या पोहायला शिकणे आणि जिंकणे शिकायला हवे, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते.