मुंबई – कोरोनामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन लागू होता आणि याच काळात वीजबिल हे मोठ्या आकड्यांच्या घरात आकारल्यामुळे जनतेत आक्रोश आणि विरोधकांनीही यावरुन सरकारला धारेवर धरलेले असतानाच ‘महावितरण’ने आता थकीत वीजबिल वसुलीचे आदेश दिले आहेत. ‘महावितरण’ने सर्व क्षेत्रिय कार्यालयास राज्यात वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसुल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडीत करण्याचे आदेश दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून मनसेनंतर आता महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजपनेही लक्ष्य केले आहे. वीज कनेक्शन खंडीत करण्याचा निर्णय म्हणजे सरकारची नवी गाथा असल्याचे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
मुळात अव्वाच्या सव्वा वीज बिल आली त्यात सवलती देण्याच्या घोषणा झाल्या पण बिल्डर, कंत्राटदारांसाठी तातडीने काम करणाऱ्या राज्य सरकारने सामान्यांच्या तोंडी पाने पुसली.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 20, 2021
यासंदर्भात ट्विट करत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक चारोळी शेअर करत ही नवी गाथा असल्याचे म्हटले आहे. मुळात अव्वाच्या सव्वा वीज बिल आली त्यात सवलती देण्याच्या घोषणा झाल्या पण बिल्डर, कंत्राटदारांसाठी तातडीने काम करणाऱ्या राज्य सरकारने सामान्यांच्या तोंडी पाने पुसल्याची उपाध्ये यांनी केली आहे.