पुण्यातील ‘एवढे’ नगरसेवक सोडणार भाजप !


पुणे – सोमवारी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहिर झाले, यात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप आपणच अव्वल स्थानी असल्याचा दावा करत आहेत. राज्यात भाजपने ५ हजार ७०० हून अधिक ग्रामपंचायतीवर सत्ता आणल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. पण ग्रामीण जनतेने महाविकास आघाडीला कौल दिल्याचे सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहेत. ग्रामपंचायत निकालांचे दावे-प्रतिदावे केले जात असतानाच एका राजकीय चर्चेने पुण्यात भाजपची झोप उडाली आहे.

भाजपने गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेत मोठे यश मिळवले होते. भाजपने मागील निवडणुकीत तब्बल ९८ नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता मिळवली, या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेतून अनेक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पणआता यातील काही नगरसेवक भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दरम्यान, या चर्चांना अफवा असल्याचे सांगत भाजप खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी खंडन केले आहे. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नसल्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. कुणीतरी मुद्दाम अशाप्रकारे बातम्या पसरवत आहेत, ज्यात काही निष्पन्न होणार नसल्याचे बापट आणि मुळीक यांनी म्हटले आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्रकारांनी हा प्रश्न विचारला होता. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ने दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यावर म्हणाले की, भाजपमध्ये नगरसेवक नाराज असल्याची चर्चा फक्त पत्रकारांमध्येच आहे. कोणीतरी पुड्या सोडत चुकीच्या बातम्या पसरवत आहे. भाजप सोडून कोणीही जाणार नाही, तर इतर पक्षातून भापामध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, पण भाजपने ही सत्ता उलथवून लावत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला होता. पुणे महापालिका हातातून गेल्याची खंत अजित पवार अनेकदा बोलून दाखवतात.

महापालिकेत भाजपा सत्तेच्या काळात अनेक नगरसेवक चांगल्या पद्धतीने काम करत असून शहरात विकासाची घौडदौड सुरू असल्यामुळे आगामी २०२२ महापालिका निवडणुकीमध्येही भाजप प्रचंड ताकदीने १०० नगरसेवक निवडून आणेल असा विश्वास भाजप खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे.