इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा


नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियासाठी पुढचे आव्हान तयार असून भारत आणि इंग्लड यांच्यातील क्रिकेट मालिकेला पाच फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीने पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली तसेच वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचे दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. यासंदर्भातील वृत्त ईएसपीएनक्रिकइन्फोने दिले आहे. पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना डच्चू देण्यात आला आहे. अक्षर पटेल याला पहिल्यांदाच कसोटीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

इशांत मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकला होता. सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत त्याने पुनरागमन केले. त्यामुळे इशांत शर्माची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये इशांत शर्माने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्याला आयपीएलमध्ये दुखापत झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले होते. त्याशिवाय कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. २०१८ नंतर हार्दिक पांड्याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.


ऑस्ट्रेलियामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांनी दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांचे संघातील स्थान कायम आहे. तीन कसोटी सामन्यात सिराजने १३ विकेट घेतल्या होत्या. तर शार्दुल ठाकूरने एकमेव कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करत ७ बळी घेतले आहेत.