ऐतिहासिक विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानी टीम इंडिया विराजमान


ब्रिस्बेन : टीम इंडियाने ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तीन गड्यांनी पराभव करत बॉर्डर गावसकर कसोटी मालिका २-१ ने खिशात घातली आहे. टीम इंडिया या ऐतिहासिक विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. ऑस्ट्रेलियाची कसोटी मालिकेत पराभव स्विकारावा लागल्यानंतर गुणतालिकेत घसरण झाली आहे.


आयसीसीने ब्रिस्बेन कसोटी सामन्यानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार अव्वल स्थानावर भारतीय संघ पोहचला आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत पाच कसोटी मालिकेत ९ विजय आणि तीन पराभव स्वीकारले आहेत. तर एक सामना अनिर्णित राखल्यामुळे भारतीय संघाच्या नावावर ४३० गुण असून विजयाची टक्केवारी ७१.७ एवढी आहे.

पाच कसोटी मालिका दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघानेही खेळल्या आहेत. न्यूझीलंडला सात सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. न्यूझीलंडच्या विजयाची टक्केवारी ७० एवढी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ८ सामन्यात विजय तर ४ सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९ इतकी आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या तीन संघामध्ये पहिल्या दोन संघामध्ये स्थान मिळवण्याची स्पर्धा आहे.