मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. गावकारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचे सोने करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या!, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीतील नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
उपमुख्यमंत्री अजित पवार, आपल्या संदेशात म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.