मग आता अर्णब गोस्वामींचे कोर्ट मार्शल होणार का – संजय राऊत


मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पुलवामा आणि बालाकोट हल्ल्याबाबत आधीपासूनच माहिती होती असे अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यामधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. दरम्यान मोदी सरकारवर यावरुन निशाणा साधला जात असून आता अर्णब गोस्वामी यांचे कोर्ट मार्शल करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचे अर्णब गोस्वामी यांच्या चॅटमधून त्यांना आधीच माहिती होते हे दिसून येते. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब असल्यामुळे आता त्यांचे कोर्ट मार्शल झाले पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांनी यावर भाष्य करण्याची मागणीदेखील संजय राऊत यांनी यावेळी केली आहे. त्यांनी आपली मते सांगून आमच्या ज्ञानात भर टाकावी असा टोला त्यांनी लगावला आहे.

सर्वच पक्षांबद्दल भाजप नेते बोलत असतात. आता त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर बोलले पाहिजे. देशाच्या सुरक्षेची माहिती बाहेर येणे, राष्ट्रीय सुरक्षेसाठी धक्का आहे. राष्ट्रीय सल्लागार असल्याप्रमाणेच अर्णब गोस्वामी बोलत होते. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूमिका मांडली पाहिजे. इतर भाजप नेत्यांनीही यावर भूमिका मांडत देशाच्या आणि राज्याच्या ज्ञानात भर पाडावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.