एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगरमध्ये उडवला भाजपचा धुव्वा


जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पुरता धुव्वा उडवला आहे. महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींपैकी नऊ गावांमध्ये विजय झाला आहे. तर इतर गावांमध्येही महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनल्सची जोरदार घौडदौड सुरु आहे.

राष्ट्रवादीत एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला तरी भाजपला फारसा फरक पडणार नाही. त्यांची उणीव भरुन काढणारे नेते भाजपकडे असल्याचा दावा गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांच्याकडून करण्यात आला होता. पण, आता मुक्ताईनगरमधील निकाल पाहता या संपूर्ण पट्ट्यात एकनाथ खडसे यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे.

खडसे परिवारात कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालांवरुन गृहयुद्ध सुरु झाले आहे. याठिकाणी पाच जागांवर शिवसेना तर सहा जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. पण, भाजप आणि राष्ट्रवादीकडून आता आपल्या विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. एकनाथ खडसे यांचे कोथळी हे गाव आहे.

तर दुसरीकडे जामनेर तालुक्यातील आपले वर्चस्व गिरीश महाजन यांनी राखले आहे. तालुक्यातील 90 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. मात्र, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे.